Saturday, 20 January 2018

गावातल्या होळीची मजा वेगळी

*गावातल्या होळीची मजाच वेगळी*
_____________________________

होळीचा दिवस उगवला की आम्हाला होळी खणायचे वेध लागायचे. दुपारी त्या जागेवर पाणी शिंपडून होळी खणायची तयारी सुरू व्हायची.त्याचवेळी आम्हा मुलांपैकी एक गट होळीसाठी लाकडं आणि गवर्‍या गोळा करायला आजूबाजूच्या घरांमध्ये जात असे. या गटात माझा समावेश असे. (कारण खोदकाम वगैरे टाळणे हा उद्देश) आमच्या आगमनाची वर्दी हातातली डबडी देत असत. कुणाच्याही घरी गेल्यानंतर दडा दडा डबडी वाजवत सामुदायिकरित्या एक परवलीचं वाक्य म्हटलं जायचं. 'पाच लाकडं पाच गवर्‍या दिल्याच पाहिजेत.' खणखणीत आवाजात मागणी मांडल्यानंतर घरातील बाई बाहेर येऊन आम्हाला लाकडं आणि गवर्‍या जे काही उपलब्ध असेल ते देत असे. गावात बहुतांश घरांत किमानपक्षी पाणी तापवायला तरी चुलीचाच वापर होत असल्याने लाकडं आणि गवर्‍या जवळपास सगळ्यांच्याच घरी सायच्या. ज्या घरात लाकडं नसत. ती मंडळी गावात लाकडाचे भारे घेऊन येणार्‍या आदिवासी मंडळींकडून भारे घेऊन होळीला देत असत. ही सगळी लाकडे आणि गवर्‍या घेऊन आम्ही मंडळी होळीच्या तिथे यायचो. तोपर्यंत खणण्याचं काम पूर्ण झालेलं असायचं. मधल्या काळात मोठी मंडळी काम कुठवर चाललंय ते बघायसाठी येऊन जायची. मग संध्याकाळी हातातली काठी टेकत टेकत अप्पाकाका यायचे. हे आमच्या गल्लीत रहाणारे पुरोहित. 'संसार केला घाई घाई म्हातारपणाला काही नाही' हे पालुपद त्यांच्या तोंडी असायचं. हे  मग मोठ्यांच्या मदतीने होळी रचायचे. होळी रचण्याचीही शास्त्रीय पद्धत आहे. आधी होळीच्या खड्ड्यात मध्ये मोठठं लाकूड ठेवायचं. मग त्याला आधाराला खाली जड छोटी लाकडं रचायची आणि त्याच्या बाजूला गवर्‍या रचायच्या. त्यामुळे मधलं लाकूड हलायचं नाही. मग हळूहळू इतर लाकडं रचत जायची. असं करत करत होळी रचण्याचे काम पूर्ण व्हायचे.

मग आजूबाजूच्या बायका येऊन होळीभोवती रांगोळी काढायच्या. छानपैकी होळीची तयारी पूर्ण व्हायची. त्यानंतर अप्पाकाका होळीची पूजा करायचे. आम्ही सगळे त्यांना हवं नको ते बघत असू. त्यानंतर होळी पेटवायचा कार्यक्रम असायचा. मान्यवरांकडुन एका जळत्या लाकडाच्या सहाय्याने होळी पेटवायचे. मग आम्ही बच्चेमंडळी होळी सगळ्या बाजूंनी पेटवायचो. मग धडधडणार्‍या ज्वालांशी स्पर्धा करत आम्ही जोरदार 'बोंब' ठोकायचो.

होळी पेटली की मग आजूबाजूची मंडळी होळीला नैवेद्य दाखवायला यायची. या नैवेद्यावेळी होळीत आख्खा नारळ वहायचे. हा नारळ थोडा भाजला गेल्यानंतर होळीतून बाहेर काढला जायचा. आणि मग तो फोडून त्यातलं खोबरं खायचं. या खोबर्‍याची चव निव्वळ अप्रतिम. होळीच्या धुराचा सुगंधही या खोबर्‍यात मिसळलेला असायचा. तो गंध आजही आठवण काढली तरी नाकात येतोय.होळी एकदा पेटली. सगळयांची जेवणं झाली, की आजूबाजूच्या घरची सगळी मंडळी होळीच्या आसपास येऊन बसायची. मग एक छानपैकी गप्पांची मैफल रंगायची. याची त्याची गंमत, टर उडविणे. किस्से सांगणे यात मजा यायची. मूळची गावातली पण नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळीही या निमित्ताने गावात यायची. तीही मग होळीवर यायची. यानिमित्ताने सगळ्यांच्या भेटी व्हायच्या. त्यामुळे गप्पांना बहर यायचा.काही मुलं गावातल्या सगळ्या होळींचा फेरफटका मारत असत. मग जातांना प्रत्येक होळीवर थांबून गप्पा मारल्या जायच्या. शिवाय प्रत्येक होळीवर गेल्यावर कचकचीत शिव्या देणं ही प्रथाही आवर्जून पाळली जायची. लहानपणी शिव्यांची एवढी 'दोस्ती' नसल्याने अनेक शिव्यांचे अर्थ कळायचे नाही. मग कधी कधी त्या शिव्या दिल्या की घरातल्यांचा पाठीवर सणसणीत धपाटा बसायचा.

होळी म्हटलं की ही सगळी मजा आठवते. लहानपणी केलेल्या गमती-जमती, करामती, पराक्रम सगळं काही आठवतं. त्यावेळी लोकांना जो त्रास दिलं त्याविषयी आज वाईट वाटत असलं तरी ती त्यावेळची मजा होती. सगळे लोक एकत्र यायचे. आनंदाने होळी साजरी करायचे. 'आमची होळी' असा एक अभिमानही असायचा. पुढे शहरात आल्यानंतर हे सगळं संपलं. होळी म्हणजे बिल्डिंगच्या पुढे एक खड्डा खणून चार दोन लाकडं आणून थोड्यावेळासाठी आग निर्माण करणं एवढंच राहिलं. ते ठीक आहे, पण त्या गप्पा, गंमत-जंमत हे सगळं सगळं गावाबरोबर गावातच राहिलं.
➖➖➖➖➖
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...