Thursday, 23 August 2018

वज्रगोपिकानाम

*वज्रगोपिकानाम*
-------------------------
भाग :- १...

*व्रजन्ति गो गोपावासार्थमत्रेति व्रजो गोपावासस्थानम ॥*
जेथे गाई गोपाळ वास्तव्याकरिता राहतात, त्या स्थानाला व्रज असे नाव आहे. तरी रूढ अर्थाने पुराणादिकांतून मथुरेच्या परिसरात यमुनेच्या तटावर बृहद्वन नामक एक सुंदर वन होते. या वनात अनेक व्रज म्हणजे गौळवाडे वसले होते. त्यात अगणित गोप राहत असत व त्याच्याजवळ अगणित गोधनही असे. याच पैकी नंदराज नामक एका श्रेष्ठ गोपाने विभूषित अशा व्रजात श्रीकृष्ण अवतार झाला. याच पवित्र भूमीत श्रीकृष्णाच्या बाललीला झाल्या. ज्याचे वर्णन भारतातील सर्व प्रांतातील साधुसंत, हरिभक्तांनी, कवींनी अनेक रूपाने केले आहे. या गोकुलात श्रीकृष्णाच्या वात्सल्यरसाचा स्वाद नंदयशोदा यांनी पूर्ण रूपाने भोगला. सख्यभक्तीचा आनंद गोपाळास श्रीकृष्णाबरोबर यमुनातीरी गाई चारत असता भरपूर भोगावयास मिळाला. गोकुळात सर्वच भक्त होते; पण माधुर्य भक्तीचा पूर्ण आविष्कार गोपिकांच्याच जीवनात झाला होता. म्हणून श्रीनारद महर्षीनी मुद्दाम आवर्जून ' *यथा व्रजगोपिकानाम ।* ' म्हणून सूत्रात त्यांचे उदाहरण दिले आहे. या व्रज भूमीचे वर्णन सर्वच पुराणांतून तंत्रग्रंथांतून केले आहे. गौतमीय तंत्रात श्रीकृष्णमुखातीलच वचन सापडते.
*भारते व्रजभूः श्रेष्ठा तत्र वृंदावनं परम् ।*
पाच योजनांचा ज्याचा विस्तार आहे असे हे वृंदावन म्हणजे माझा देहच आहे असे भगवान म्हणतात. जेथे भगवान श्रीकृष्णाच्या सर्व वैभवाचा आविष्कार झाला होता अशी ही लीलाभूमी आहे. या व्रजाच्या अंतर्गत यमुनापुलिन, गोवर्धन पर्वत, गव्हरवन, कदम्बखंडिया, नंदग्राम, बरसाना कामवन, चरणाद्रि इत्यादी अनेक स्थाने लीलाभूमीस्वरूप मानली जातात. स्वतः ब्रह्मदेव या भूमीत आपल्याला जन्म प्राप्त व्हावा अशी अपेक्षा करतो. श्रीकृष्णाजवळच ब्रह्मदेवाने म्हटले आहे.

*तद्‌भूरिभाग्यमिहजन्मकिमप्यटव्यांयद्‍गोकुलेऽपिकतमाङ्घ्रिरभिषेजोकम् *
*यज्जीवितं तु निखिलं भगवान्मुकुन्दस्त्वद्यापियत्पदरजः श्रृतिमृग्यमेव ॥*
 - भागवत स्कंध १० - १४ - ३४.

तसेच नारद ज्या गोपिकांचे उदाहरण देतात त्यांनीही व्रजाचे - गोकुळाचे - वर्णन केले आहे.
*जयति तेऽधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्‍वदत्र हि ॥*
 भा. १० - ३१ - १

गोपिका म्हणतात, "हे दीनबन्धो, तू जन्मल्यापासून हे गोकुळ अधिक उत्कर्षाला प्राप्त झाले आहे, येथे लक्ष्मी अखंड आश्रयाला आली आहे." मुळात ती व्रजभूमी ही पुण्यभूमीच होती. पण श्रीकृष्णअवतारामुळे तिला फार श्रेष्ठत्व प्राप्त झाले. त्या व्रजवासी ज्या गोपिका होत्या, त्यांचे उदाहरण नारद आपल्या भक्तिलक्षणाच्या पुष्टीकरिता देतात. वास्तविक त्या गोपिका या सामान्य स्त्रिया नव्हेत ज्याचे वर्णन सर्व ऋषिमुनी, देवता, साधुसंत करतात. त्यांना सामान्य म्हणणे कसे शक्य आहे ? गोपी, गोपिका याचा शब्दार्थ खालील प्रमाणे केला आहे.
गाः इंद्रियाणि पान्ति इति गोप्यः ।
ज्या आपल्या इंद्रियांचे (विषयापासून) रक्षण करतात त्या गोपी.
गां दृष्टिं पान्ति रक्षन्ति (दुर्विषय गमन राहित्येनेति) गोप्यः गां म्हणजे दृष्टी (ज्ञान) तिचे दुष्ट विषयाकडे न जाऊ देता ज्या रक्षण करतात त्या गोपी. आणखीही एक चांगला अर्थ संभवतो.
*गोभि. इन्द्रियैः पिबति श्रीकृष्णरसमिति गोपी ।*
'गो'*  इंद्रियांनाही म्हणतात, आपल्या इंद्रियांच्या द्वारे जी श्रीकृष्णभक्तिरसाचे पान करते ती गोपी.
' *गोपायति* ' इति गोपी म्हणजे आपल्या भक्तिभावनेचे जी रक्षण करते ती गोपी.
येथे 'व्रजगोपिकानाम्' असे अनेकवचन आहे. विशेष म्हणजे गोकुळवासी सर्व स्त्रिया, सुना, लेकी, सास्वा सर्वच श्रीकृष्णावर निरतिशय प्रेम करणार्‍या होत्या. पुराणातून त्यांची अनेक नावेही सापडतात. कित्येक पुराणादिकांतून गोपिकांचे पूर्ववृत्तही आले आहे. काही देवता तप करून गोपीरूपाने भगवत्प्रेमाचा अनुभव घेण्याकरिता आल्या होत्या. काही ऋषीही तप करून गोपिकारूपाने अवतरले होते, तसेच श्रुतीही गोपिका रूपाने भगवत्प्रेम सुख भोगण्यास अवतरल्या होत्या.

गोप्यस्तु श्रुतयो ज्ञेया. ऋषिजा गोपकन्यकाः ।
देवकन्याश्‍च राजेंद्र न मानुष्या कदाचन ॥
श्रीएकनाथ महाराज सांगतात -
त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती । श्रुतीरूपें नव्हें मत्प्राप्ती ।
तै परतल्या म्हणोनि नेति नेति । माझी सुखसंगती न पवेंचि ॥
विषयबुद्धी तें मुख्य अज्ञान । तें असता मी न भेटे जाण ।
असता वेदोक्त जाण पण । तेणेंही संपूर्ण न भेटे मी ॥
जाणीव नेणीव गेलिया निःशेख । माझे पाविजे निजात्मसुख ।
श्रुति जाणोनि हे निष्टंक । गोकुळी त्या देख सुखार्थ आल्या ॥ - एकनाथी भागवत १२. १६३ - ६५

दुसरीही एक कथा उपलब्ध होते. त्रेतायुगात श्रीरामचंद्राचा अवतार झाला. सीतास्वयंवराकरता श्रीरामचंद्र मिथिला नगरीला आले, धनुर्भंग झाला, सीतेने रामचंद्राला माळ घातली, विवाहसोहळा समारंभपूर्वक पार पडला, तेथे ज्या मिथिला नगरीतील स्त्रिया जमल्या होत्या त्याही श्रीरामचंद्राचे ते कोटिकंदर्पदर्पहारी लावण्य बघून मोहित झाल्या. त्यांचीही उत्कट इच्छा झाली की आम्हांलाही हेच पती लाभले तर किती चांगले होईल, त्याकरिता आम्ही वाटेल तो त्याग करू. त्यानी आपली उत्कट वासनाही श्रीरामापुढे प्रगट केली, पण राम अवतार हा मर्यादापुरुषोत्तम होता, एकपत्नीत्वाची मर्यादा पाळणे अवश्य होते. त्या मिथिलानिवासी स्त्रियांचा उत्कटभाव पाहून श्रीरामचंद्र त्यांना म्हणाले, 'तुम्ही शोक करू नका.'
*द्वापारांते करिष्यामि भवतीनां मनोरथम् ।*
श्रद्धया परया भक्त्या व्रजे गोप्यो भविष्यथ ॥
'द्वापारयुगाचे शेवटी श्रीकृष्ण अवतारात तुमचे मनोरथ पूर्ण करीन. तुम्ही परमश्रद्धावान आहात, त्या वेळी तुम्ही गोकुळात गोपी बनाल.'

क्रमश..
=======================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह**
-------------------------

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...