Monday, 27 August 2018

वज्रगोपिकानाम :- ४..

*वज्रगोपिकानाम*
-------------------------
   *भाग :- ४..*

गोकुळामध्ये सहस्रावधी गोपिका होत्या त्याचे यूथ (संघ) होते. त्या प्रत्येकांची काही वैशिष्ट्ये होती. त्या त्या संघाच्या प्रमुख नायिका ज्या त्यांची नावे ही भक्तिशास्त्रीय ग्रंथातून दिली आहेत. गौडीय संप्रदायाचे एक श्रेष्ठ संत श्रीरूपगोस्वामी यांच्या ' *उज्ज्वल नीलमणी* ' नामक भक्तिशास्त्रावरील अपूर्व ग्रंथात गोपिका प्रमुखाच्या काही नावाचा निर्देश केला आहे. राधा, चंद्रावली, विशाखा, ललिता, श्यामा, पद्मा, शैब्या, भद्रिका, तारा, विचित्रा, गोपाली, धनिष्ठा, पालिका, मंगला, विमला, लीला, कृष्णा, विशारदा, तारावली, चकोराक्षी, शंकरी, कुंकुमा, खञ्जनाक्षी, मनोरमा इत्यादी इत्यादी. एकएका यूथामध्ये अनेक गोपिका होत्या. त्यात राधादी आठ या यूथप्रमुख मानल्या आहेत. म्हणून श्रीकृष्णही सांगतात -

*ज्यासी झाली माझी संगती । त्या एकदोन सांगो किती ।*
*शतसहस्त्र अमिती । निजपदाप्रती पावल्या ॥*
        एकनाथी भागवत १२ - १३ 

स्वतः श्रीकृष्ण भगवान गोपिकांचा सर्व व्यवहार कृष्णमय कसा बनला होता हे उद्धवास गोकुळास निरोप देऊन पाठविताना सांगतात.
*ता मन्मनस्का मत्प्राणा मदर्थे त्यक्त दैहिकाः । *
*मामेव दयितं प्रेष्ठ मात्मानं मनसांगताः ॥*
           भागवत १०. ४६. ४

'हे उद्धवा ! गोपिकांचे मन अखंड सर्व व्यवहार करीत असताही माझ्याच ठिकाणी अनुरक्त आहे. त्यांचे प्राण, त्यांचे जीवनसर्वस्व मीच आहे, माझ्याकरिता त्यांनी देहसंबंधी पति-पुत्र, सोयरे या सर्वांचा त्याग केला आहे, त्यांनी बुद्धीनेही मला आपला प्रियतम, एवढेच नव्हे तर, आपला आत्मा मानला आहे.' खरा भक्त तोच आहे की तो ज्या भज्य अशा प्रभूची भक्ती करतो, त्याला ती प्रिय वाटली पाहिजे, या कसोटीस व्रजवासी गोपिकांची भक्ती पूर्ण रूपाने उतरते म्हणून नारदमहर्षीनी गोपिकांचे उदाहरण आपल्या भक्तीच्या लक्षणाकरिता स्वीकारले आहे. भगवद्‌भक्त श्रीतुकाराम महाराजांनी आपल्या बाळक्रीडा प्रकरणातील अभंगातून गोपिकांचा सर्व व्यवहार कृष्णमय कसा झाला होता याचे वर्णन केले आहे -
*ज्यांचे कृष्णी तन-मन झाले रत । गृह-पति-सुत विसरल्या ॥ *
*विष तया झाले धन-मान-जन । वसविती वन एकांती त्या ॥ *
*क्षणभरी होता वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥ *
*त्याचे ध्यानी मनी सर्व भावे हरी । देह काम करी चित्त त्याचे ।* 
*कृष्ण तया ध्यानी, आसनी, शयनी ।*
*कृष्ण देखे स्वप्नी कृष्णरूप ॥* 
*तटस्थ राहिले सकळ शरीर ।* *इंद्रियें व्यापार विसरली ॥ *
*विसरल्या तहान, भूक, घरदार । नाही हा विचार असो कोठे ॥* 
*विसरल्या आम्ही कोणीये जातीच्या । वर्णाही चहूंच्या एक झाल्या ॥ *

आणखीही अनेक अभंगातून गोपिकांच्या भक्तीचे वर्णन केले आढळते. अखिल आचार भगवदर्पित होणे हे जे भक्तीचे नारदप्रोक्त लक्षण आहे ते व्रजवासी गोपिकांच्या ठिकाणी पूर्णत्वाने प्रतीत होते, याबद्दल सर्व संतांची एकवाक्यता आहे. म्हणून सर्वांनी भक्तिमार्गात त्यांना फार श्रेष्ठ स्थान दिले आहे. तसेच नारदांच्या भक्ति-लक्षणाचे दुसरे अंग ' *तद्विस्मरणे परम व्याकुलता'* हेही गोपिकांच्या ठिकाणी पूर्ण दिसून येते. त्यांना कोणत्याही अवस्थेत श्रीकृष्णाचा विसर पडत नव्हता. मथुरानिवासी कुलाङगना गोपिकांच्या अवस्थेचे वर्णन करितात व त्यांना धन्य समजतात. 
*या दोहनेऽवहनने मथनोपलेपप्रेंङखेङखनार्भरुदितोक्षणमार्जनादौ ।*
*गायन्तिचैनमनुरक्तधियोऽश्रु कष्ठयो धन्या व्रजस्त्रिय उरुक्रमचित्तयानाः ॥*
       - भागवत, १० - ४४ - १५ 

'ज्या गोपिका गायीच्या दुधाचे दोहन करतेवेळी, साळी इत्यादी कुटताना, सडासंमार्जन करताना, बालकाना झोके देताना, दह्याचे विरजण घालताना, बालके रडत असताना गाणी म्हणत असता सर्व व्यवहारात प्रेमपूर्ण चित्ताने, अश्रुपूर्ण नेत्रांनी श्रीकृष्णाचे गुणगान करतात, श्रीकृष्णाच्या ठिकाणी ज्यांचे चित्त जडलेले आहे त्या धन्य आहेत.'

क्रमश..
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...