Monday, 24 September 2018

भक्तीत सिध्दता

*भक्तीत सिध्दता*
-------------------------

भक्ति सिद्ध होण्याकरिता आवश्यक असा विषयत्याग होण्याकरिता सत्संगतीच पाहिजे. विषयात दोषदर्शन, विषयाची अनित्यता, क्षयातिशयादि दोष युक्तता, त्यातील परिणाम, ताप, संस्कार, दुःख, गुणवृत्ती, विरोधादिदोष सत्संगतीनेच यथार्थ स्वरूपाने कळत असतात. श्री तुकाराम महाराज म्हणतात, *"बैसता संताचे संगती । कळो आले कमळापती । आपुली कोणीच नव्हती । निश्चय चित्त दृढ झाला ॥ १ ॥"* तसेच संगत्याग, संग म्हणजे आसक्ती. बाह्य विषयात दोषदर्शन होऊन कदाचित तात्कालिक त्याग झाला तरी अंतरातील विषयत्याग म्हणजे संग नष्ट होत नाही. ती आसक्ती नष्ट होण्याकरिताही सत्संगती उपयुक्त आहे. 

तिसरे अव्यावृत भजन - जे भजन भोगासाठी होते ते अव्यावृत म्हणजे अखंड कधी होत नाही. अव्यावृत भजनाकरिता संतकृपेचीच आवश्यकता आहे. ध्रुव, प्रल्हाद, वाल्मीकि याचे जे अखंड भजन होत होते श्री नारदाच्या कृपेमुळेच. तुकाराम महाराज म्हणतात, 
*'कृपा केली संतजनी । माझी अलंकारिली वाणी । प्रीत हे लाविली कीर्तनी । तुका चरणी लोळतसे ॥'* म्हणून जी साधने मागील सूत्रांतून सांगितली आहेत ती ती सर्व सत्संगतीने सिद्ध होतात. म्हणून ती सत्संगतीच साधण्याचा साधकाने प्रयत्न करावा. त्यायोगे वरील सर्व साधने व साध्य प्राप्तीही अनायासेच सिद्ध होईल. सूत्रात द्विरुक्तीने सांगितले आहे त्याचे कारण ' *भक्ती* ' हे येथे साध्य आहे व अन्य साधने आहेत, ते साध्य व ती साधने महत्संगानेच सिद्ध होतात हे सिद्ध करण्याकरिता द्विरुक्ती असावी असे वाटते.
=======================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...