Wednesday, 29 August 2018

वज्रगोपिकानाम :- ५

*वज्रगोपिकानाम*
----------------------------
      भाग :- ५..

गोपिकांना क्षणभरही श्रीकृष्णाची विस्मृती पडत नव्हती; पण जर क्षणही त्यांना श्रीकृष्णाचा वियोग झाला तर मात्र प्राणांतापेक्षाही त्यांना अधिक दुःख होत होते. रासलीलाप्रसंगी गोपिकांच्या प्रेमाची परीक्षा पाहण्याकरिता श्रीकृष्ण गुप्त झाले तेव्हा त्यांना त्या विरहाने किती दुःख झाले हा सर्व प्रकार भागवत दशमस्कंध अध्याय एकोणतीस ते तेहतीस (ज्यांना रास पंचाध्यायी म्हणतात) यात विस्ताराने आला आहे. त्या वेळी त्यांची अवस्था कशी झाली होती याचे शुकाचार्यानी वर्णन केले आहे -
*तन्मनस्कास्तदालापास्तद्विचेष्टास्तदात्मिका. । *
*तद्‍गुणानेव गायन्त्यो नात्मागाराणि सस्मरुः ॥*
भागवत १० - ३० - ४ 

'श्रीकृष्णाच्या ठिकाणीच ज्यांचे मन लीन आहे, त्याचीच चर्चा, त्याच्याच लीलांचे अनुकरण करणार्‍या, त्याच्याच ठिकाणी चित्ताची एकात्मकता प्राप्त केलेल्या, त्याच्याच श्रेष्ठ गुणांचे अहर्निश गायन करणार्‍या त्या गोपिकांना आपल्या शरीराची किंवा गृहादिकाची स्मृतीही नव्हती.' श्रीकृष्णवियोगाने त्यांच्या चित्तात किती व्याकुलता झाली होती हे गोपिकांनी जे विरहगीत गायिले आहे, ज्यास भागवतामध्ये गोपीगीत अशी संज्ञा आहे त्यातून स्पष्ट होते. प्रेमाची उत्कटता विरहात प्रतीत होते.

त्या विरहाच्या व्याकुलतेत चिंता, जागर, उद्वेग, कृशता, मलिनागता, प्रलाप, व्याधी, उन्माद, मोह, मृत्यू या दहा अवस्था प्रगट होतात. श्रीशुकाचार्यानी गोपिकांच्या ठिकाणी या सर्वाची उत्कटता किती झाली होती याचे विस्तृत वर्णन या पाच अध्यायात केले आहे. विरहाने व्यापलेल्या गोपी वृक्ष, पशू, पक्ष्यांशीच बोलू लागल्या. त्याच विरही अवस्थेतील श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अभंग पुष्कळ आहेत. त्यापैकी प्रसिद्ध म्हणजे,
धनु वाजे घुणघुणा वारा वाजे रुणझुणा । 
भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का ॥ १ ॥ 
चांदवो चांदणे चापे वो चंदनु । 
देवकीनंदनुविण नावडे वो ॥ २ ॥ 
चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी । 
कान्ही वनमाळी वेगी भेटवा का ॥ ३ ॥ 
सुमनांची सेज शीतळ वो निकी । 
ओले आगीसारिखी वेगें विझवा कां ॥ ४ ॥ 

हा आहे. श्रीसंत नामदेव, एकनाथ, तुकाराम, निळोबा यांच्याही गाथ्यातून अशा विरहिणी भूमिकेवरील गोपिकांच्या प्रेमाचे वर्णन केलेले अभंग आहेत. याचे तात्पर्य गोपिकांच्या व्याकुळतेच्या भूमिकेस सर्वानीच महत्त्व दिलेले आहे. भगवान श्रीकृष्णच उद्धवाजवळ त्यांच्या व्याकुळतेचे वर्णन करीत आहेत.

बळिभद्रासमवेत तत्त्वता । अक्रूरें मज मथुरे नेता । 
तै गोपिकासी जे झाली व्यथा । ते सांगता मज न ये ॥ 
ते त्याची अवस्था सांगता । मज अद्यापि धीर न धरवे चित्ता । 
ऐसे देवो सांगता । कंठी बाष्पता दाटली ॥ 
मज मथुरे जाता देखोनि । आसुवाचा पूर नयनी । 
हृदय फुटे मज लागुनि । प्रेमलोळणी घालिती ॥ 
पोटातील परमप्रीती । सारिता मागे न सरती । 
धरिले चरण न सोडिती । येती काकुळती मजलागी ॥ 
मजवीण अवघे देखती वोस । माझीच पुनः पुनः पहाती वास । 
थोर घालूनि निश्वास । उकसाबुकसी स्फुंदत ॥ 
माझेनि वियोगे तत्त्वता । त्यासी माझी तीव्र व्यथा । 
ते व्यथेची अवस्था । बोली सांगता मज न ये ॥ एकनाथी भागवत १२ - १२५ - ३० 

भक्तिशास्त्रकारानी तर संयोगातही वियोगोपलालन होत असणे ही भक्तिप्रेमाची पराकाष्ठा सांगितली आहे. श्रीसंतश्रेष्ठ गुलाबराव महाराज यांनी नारदभक्तिसूत्रावरील आपल्या संस्कृत भाष्यात 'राधासुधानिधी' या काव्यातील एक श्लोक उद्‌धृत केला आहे.
*अंकस्थितेऽपि दयिते कमपि प्रलापं हा मोहनेति मधुरं विदधात्यकस्मात् । *
*श्यामानुरागमदविव्हलमोहनांगी श्यामामणिर्जयतिकापि निकुञ्जसीम्नि ॥ *
'एका वेळी राधादेवी ही श्रीकृष्णाच्या अंकावर असताही हे कृष्णा ! हे मोहना ! असा काही प्रलाप अकस्मात करू लागली. याचे कारण शाम जो श्रीकृष्ण तद्विषयक अनुरागमदाने विव्हल झालेले तिचे हृदय हेच होय.

या विव्हलतेत भक्तीची पराकाष्ठा आहे; व हिचा व्रजवासी गोपिकामध्येच पूर्ण आविष्कार झाला होता, म्हणून नारदांनी आपल्या भक्तिलक्षणाकरिता गोपिकांचे उदाहरण घेतले आहे.

यावर कोणी शंका घेईल की, गोपिका श्रीकृष्णाना परमात्मा समजत होत्या का ? त्या तर त्याला एक सुंदर पुरुष म्हणून मानीत होत्या व जार बुद्धीने त्याच्यावर प्रेम करीत होत्या, त्या कामासक्त होत्या, असे असता त्यांच्या त्या वैषयिक प्रेमाला भक्ती कसे म्हटले जाईल ? याच शंकेचे उत्तर देण्याकरिता पुढील दोन सूत्राची रचना झाली आहे.
======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...