Wednesday, 29 August 2018

वज्रगोपिकानाम :- ६

*वज्रगोपिकानाम*
-------------------------
     भाग :- ६..

भक्तिप्रेमाला महात्म्यज्ञानाची जोड असावी, नसता त्यात दोष निर्माण होण्याचा संभव असतो. भेदबुद्धी, व्यभिचार, फलकामना, स्वसुखाभिलाष इत्यादी निर्माण होतात. 'माहात्म्यज्ञानपूर्वक सुदृढ स्नेह विशेष म्हणजे भक्ती' असे नारदाचे पाञ्चरात्रातील मत पूर्वी उद्‌धृत केले आहे. श्रीज्ञानेश्वरमहाराज हीच गोष्ट दृष्टांताने सांगतात -

*पाहे पा शाखापल्लव वृक्षाचे । हे काय नव्हती एकाचि बीजाचे । *
*परी पाणी घेणे मुळाचे । ते मुळीचि घापे ॥ *
*का दहाही इंद्रिये आहाती । इथें जरी एकेचि देहीची होती । *
*आणि इही सेविले विषय जाती । एकाचि ठाया ॥ *
*तरी करोनि रससोय बरवी । कानी केवि भरावी ॥ *
*फुले आणोनि बांधावी । डोळा केवी ॥ *
*तेथ रसु तो मुखेचि सेवावा । परिमळु तो घ्राणेचि घ्यावा । *
*तैसा मी तो यजावा । मीचि म्हणोनि ॥*
            ज्ञानेश्वरी ९. ३४६ - ४९ 

म्हणून गोपिकांना जर भगवत्तत्वाचे यथार्थ ज्ञान नसते तर ते प्रेम भक्ती या संज्ञेस प्राप्त झाले नसते. तसेच मागील सूत्रात गोपिकांचे जे वर्णन केले आहे ते सर्व व्यर्थ झाले असते. सर्व ऋषी, मुनी, साधुसंत किंबहुना प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान त्याच्या दिव्य व अलौकिक प्रेमाचे वर्णन करतो त्या अर्थी ते अलौकिक व माहात्म्यज्ञानयुक्तच प्रेम होते. कित्येक बहिर्मुखाना संशय येणे शक्य आहे. श्रीमद्‌भागवतामध्ये प्रत्यक्ष परिक्षिती राजानेच अशी शंका घेतली होती, तिचे उत्तर शुकाचार्यांनी स्पष्ट दिले आहे.

*कृष्णं विदुः परं कांतं न तु ब्रह्मतया मुने । *
*गुणप्रवाहीपरमस्तासां गुणधियां कथं ॥*
         भागवत १० - २९ - १२ 

परिक्षिती म्हणतो, गोपिका कृष्णास कांत, पती समजत होत्या. त्यांना त्याच्या ब्रह्मरूपतेचे ज्ञान नव्हते, त्याचा गुणप्रवाहाचा बाध म्हणजे मोक्ष कसा झाला ? याचे उत्तर शुक्राचार्यानी दिले आहे. ते म्हणाले -
*उक्तं पुरस्तादेतत्ते चैद्यः सिद्धिं यथा गतः *
*द्विषन्नपि हृषीकेशं किमुताधोक्षज-प्रियाः ॥ १३ ॥ *
'तुला पूर्वीच सांगितले आहे की, चैद्य शिशुपालही श्रीकृष्णाच्या द्वेषाने मुक्त झाला, या गोपी तर त्या अधोक्षजाला प्रिय होत्या.' मानवाच्या आत्यंतिक कल्याणाकरिता भगवान व्यक्त स्वरूप धारण करतो. गोपिकांना हे सर्व ज्ञात होते, म्हणून त्यांना माहात्म्यज्ञान होते असे नारद म्हणतात. माहात्म्यज्ञान म्हणजे भगवन्महत्त्व अनेक प्रकारचे असते. रूप, गुण, माधुर्य, सत्ता, सामर्थ्य, ऐश्वर्य, व्याप्ती, भक्तरक्षण, दुष्टनाश, दुरितनाश, शक्ती इत्यादि इत्यादि प्रकार संभवतात. त्या सर्वाचे गोपिकांना ज्ञान संपूर्ण होते, असे गोपीगीत व अन्य प्रसंगी त्याचे जे अनेक उद्‌गार व्यक्त झाले आहेत त्यावरून सिद्ध होते. श्रीकृष्ण सामान्य मानव नव्हता, तर परमेश्वर होता असे गोपिकांनी म्हटले आहे. (भा १० - २९ - ३३) तसेच गोपिका रासलीलाप्रसंगी वेणुनादाने मोहित होऊन श्रीकृष्णाकडे आल्या तेव्हा श्रीकृष्णानी त्यांना परत घरी जाऊन आपल्या पतीची सेवा करा असा उपदेश केला असता गोपिकांनी श्रीकृष्णास उत्तर दिले की -

*यत्पत्यपत्यसुहृदामनुवृत्तिरंग *
*स्त्रीणां स्वधर्म इति धर्मविदा त्वयोक्तम् ।*
*अस्त्येवमेतदुपदेशपदे त्वयीशे *
*प्रेष्ठो भवान्स्तनुभृतां किल बंधुरात्मा ॥*
         भा १० - २९ - ३२ 

"हे श्रीकृष्णा ! पती, पुत्र, बंधू व स्वजनांची सेवा करणे हा स्त्रियांचा धर्म आहे असे तू म्हणतोस ते खरे आहे, पण हा उपदेश तर तुझीच सेवा करण्याची प्रेरणा देत आहे, तू भगवान आहेस, आमच्या पती, पुत्र, बंधू स्वजनादिकांचाही तूच आत्मा आहेस. तुझ्यामुळेच त्यांना पतीपणा प्राप्त झाला आहे."
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...